ठाणे, नागपूरातील गुन्हेगारीवरुन अंबादास दानवेंनी सरकार, गृहमंत्र्यांना घेतले फैलावर

महाराष्ट्र

मुंबई: ठाणे, नागपूर मधील महिला अत्याचार, हिरे व्यापाऱ्यांना धमकी प्रकरण, दिवसा ढवळ्या हत्या आदी गुन्ह्यांत मोठया प्रमाणात वाढ झाली असून या सर्व गुन्ह्यांत ठाणे, नागपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. ठाण्याचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री व नागपूरचे लोकप्रतिनिधी हे उपमुख्यमंत्री असूनही येथील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्र्यांचे वाभाडे काढले. तसेच सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हे सरार्स जनतेला, अधिकाऱ्यांना धमक्या देऊन उघडपणे कायदा हातात घेत आहेत.

आमदार, खासदार यांची कमी केलेली सुरक्षा, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर करण्यात आलेला प्राणघातक हल्ला, खासदार संजय राऊत व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जीवाला असलेला धोका, लोकप्रतिनिधीवर दाखल करण्यात येणारे खोटे गुन्हे, शिवसेना जिल्हाधिकाऱ्यावरील हल्ला,पत्रकार शशिकांत वारिसे हत्याप्रकरणी दानवे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. हिंगोली, कळंबोलीत मोठया प्रमाणात अवैध जुगार सुरू असून यात सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहेत, असा आरोप दानवे यांनी केला. संभाजीनगर मधील एसीपीने महिलेशी केलेल्या गैरवर्तनानंतर त्यांची मेडिकल चाचणी न करता त्यांना अटक करुन जामीन मिळाला. त्या पोलीस अधिकाऱ्याची पूर्व पार्श्वभूमी पाहता बडतर्फ करण्याची मागणी दानवे यांनी केली.

ठाणे येथे काही लोकांना पैसे देऊन सुरक्षा दिली जाते, मात्र ते लोकं शिंदे गटात गेल्यावर त्यांना सरकारी सुरक्षा मोफत दिली जाते. हे सरकार गुंडांच्या संरक्षणासाठी आहे की लोकशाहीने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सुरक्षा देण्यासाठी आहे, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. रामराज्य व शिवशाहीच राज्य म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. येथे माता भगिनी सुरक्षित नाही. सत्ताधारी पक्षाचे अनेक लोक हे गुन्ह्यांत सहभागी असतात, असा गंभीर आरोप दानवे यांनी करत कायदा व सुव्यस्थेप्रकरणी दानवे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.