मुंबई: परवडणारी घरे, दर्जेदार मूलभूत सुविधा आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था या तीन प्रमुख बाबींवर भर देत मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन Dr. Shrikant Shinde यांनी केले.
माजी खासदार Rahul Shewale यांच्या संकल्पनेतून Mumbai Metropolitan Region Development Authority तर्फे मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित ‘एमएमआर@2047’ या परिषदेत ते बोलत होते. परिषदेत लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एमएमआरच्या भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा केली.
राऊंड टेबल चर्चेदरम्यान बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने विविध धोरणांमध्ये आवश्यक बदल करून लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून केवळ घरेच नव्हे, तर दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकारचा भर आहे. म्हाडा, एमएमआरडीए आणि एसआरएसारख्या संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणारे पुनर्विकास प्रकल्प एमएमआरचे चित्र बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, आधुनिक रस्ते, मेट्रोचे विस्तारित जाळे, वॉटर टॅक्सी आणि पॉड टॅक्सी यांसारख्या वाहतूक सुविधांमुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल. मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखाली एमएमआरचा सर्वांगीण कायापालट होईल, असेही त्यांनी सांगितले.
परिषदेचे उद्घाटन नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव Aseem Kumar Gupta यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांनी पायाभूत सुविधा, शहरी नियोजन आणि विकासासंदर्भातील विविध विषयांवर विचारमंथन केले. परिषदेच्या समारोपावेळी पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
धारावी पुनर्विकास देशासाठी दिशादर्शक
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील पुनर्विकासाच्या संकल्पनेला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. केवळ घरे उपलब्ध करून देण्याऐवजी चांगले रस्ते, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि मोकळ्या जागांसह सर्व सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प देशभरातील पुनर्विकास योजनांसाठी आदर्श ठरेल. या प्रकल्पामुळे आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे आधुनिक नगरात रूपांतर होईल, असेही त्यांनी सांगितले.