मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरात सुरू आहेत.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलिनीकरणासाठी पुढाकार घेण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र अजित पवार गटातील नेत्यांमध्ये या विषयावर संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार की नाही, हा प्रश्न सध्या कळीचा ठरला आहे.
दरम्यान, दोन्ही गटांकडून विलिनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार १२ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर झालेल्या चर्चांची माहिती देणार असल्याचे जाहीर केले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुनेत्रा पवार यांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला, तर आम्हाला विलिनीकरण करावेच लागेल, असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले होते.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरे म्हणाले, “हसन मुश्रीफ हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. या विषयावर सखोल चर्चा केली जाईल. १० तारखेला मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी (सुनेत्रा पवार) उपस्थित राहतील, तेव्हा या विषयावर चर्चा होऊ शकते. त्यानंतर त्या दिल्लीतही जाऊ शकतात. राष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट, तसेच राज्यसभेच्या सदस्या म्हणून असलेल्या संवैधानिक जबाबदाऱ्या या सर्व बाबींचा विचार करून योग्य वेळेला निर्णय घेतला जाईल.”
विलिनीकरणाचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेणार का, की पक्षाच्या कोअर कमिटीत पुन्हा चर्चा होणार, या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले,“२०२३ मध्ये जो निर्णय घेतला, तो आम्ही सर्वांनी एकत्र बसून घेतला होता. वहिनी या आमच्या विधिमंडळ पक्षाच्या आणि पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे या विषयावर एकत्र चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस हा दादांचा राजकीय परिवार आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतरही दादांनी दाखवलेली राजकीय इच्छाशक्ती आणि राज्यातील जनतेने दिलेला ७३ टक्के स्ट्राईक रेट हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णयही योग्यपणानेच घेऊ.”
एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर सध्या अनिश्चितता कायम असून पुढील काही दिवसांत होणाऱ्या बैठका आणि नेत्यांच्या भूमिकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.