धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी १० वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली असून त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या अवघ्या ३० मिनिटांतच निकालाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.
धाराशिव तालुक्यातील ढोकी पंचायत समितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अमर नाना समुद्रे यांनी ४१८ मतांनी विजय मिळवत पक्षाचं विजयी खातं उघडलं आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये ठाकरे गटाने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे.
दरम्यान, कळंब तालुक्यातील ईटकुर गटातून शिवसेनेचे उमेदवार आनंद पिंटू लंगडे विजयी झाले असून पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे.
जिल्हा परिषदेसाठी ५५ जागांवर लढत
धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत.
जिल्हा परिषद: ५५ जागा
पंचायत समिती: ११० जागा
एकूण उमेदवार: ९६७
सर्व जागांसाठी आज मतमोजणी सुरू असून निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर: प्रतिष्ठेची लढत
धाराशिव लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर अर्चना पाटील या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आहे.
तेर गटात तिरंगी लढत होत असून
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)
ठाकरे गट समर्थित कीर्तीमाला खटावकर
अर्चना पाटील
यांच्यात थेट सामना रंगला आहे. वरकरणी तिरंगी लढत असली तरी ही लढत भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
वाढीव मतदानाचा फटका कुणाला?
तेरमध्ये यंदा ७० टक्के मतदान झालं असून गेल्या वेळेपेक्षा मतदानात वाढ झाली आहे. वाढीव मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
जिल्हा परिषद जागा ओपन महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अर्चना पाटील यांनी अध्यक्षपदाचीही दावेदारी केली असून त्यानुसार प्रचार करण्यात आला होता. या मुद्द्यावरून काही काळ भाजप आणि शिवसेनेत राजकीय तणावही पाहायला मिळाला.