मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या मतदानात जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितींच्या 1,462 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत एकूण 7,438 उमेदवार रिंगणात होते.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
पहिल्या 200 जागांचा कल जाहीर
जिल्हा परिषदेच्या 731 जागांपैकी आतापर्यंत 200 जागांचा कल हाती आला असून, पहिल्या आकडेवारीनुसार महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली आहे.
सकाळी 11 वाजेपर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे
भाजप – 70
शिवसेना (शिंदे गट) – 38
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 43
काँग्रेस – 21
शिवसेना (ठाकरे गट) – 14
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 3
इतर – 11
पहिल्या कलानुसार राज्यात महायुतीचा प्रभाव दिसून येत आहे.
कोकणात महायुतीची बिनविरोध बाजी
कोकण विभागात महायुतीने तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 8 तर पंचायत समितीत 17 जागा महायुतीने बिनविरोध मिळवल्या आहेत.
50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध विजयी ठरला आहे. तर 100 सदस्यांच्या पंचायत समितीत भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून शिवसेनेचे प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. महाड पंचायत समितीतील सवाने धामणे गणातून शिंदे शिवसेनेचे अनिल जाधव हे विरोधकांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडून आले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या डॉ. पद्मजा कांबळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.