लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज; डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी साधनसामग्री, तंत्रज्ञान व निधीची गरज – आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रतिपादन

मुंबई: शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यासाठी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरेसा निधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचा सूर आज येथे आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये उमटला. विधान परिषद उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन: सक्षमीकरणाचे मार्ग” या विषयावर हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता.या वेबिनारमध्ये देश-विदेशातील कायदेतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांवरील हिंसाचाराच्या विविध प्रकारांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक कायदे सुधारणा आणि न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातील कार्यप्रणालीसाठी लहान आणि व्यापक स्तरावर न्याय व विकास यंत्रणा मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

खासदार डॉ. डी. पुरंदेश्वरी यांनी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी प्रभावी अर्थसंकल्पीय नियोजन आणि ‘निर्भया’ योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला. ओडिसा विधानसभा अध्यक्षा सुरमा पाधी यांनी महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि संरक्षणाच्या हक्कांना बळकट करण्यासाठी कायद्याची भूमिका स्पष्ट केली.

ज्येष्ठ विदुषी डॉ. पॅम राजपूत यांनी ‘CEDAW’ कराराच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय देण्यासाठी भेदभावमुक्त प्रणाली विकसित करण्याची गरज व्यक्त केली. लंडनस्थित रेणुका फडके यांनी आर्थिक साक्षरता आणि सुरक्षित सामुदायिक जागांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जागतिक दृष्टिकोन मांडला.

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी भारतात असलेल्या विविध कायद्यांची माहिती घेऊन महिलांनी आपले हक्क जपावेत आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन केले.

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस आणि शासकीय यंत्रणांना लिंगाधारित हिंसाचार व मानवी हक्कांबाबत प्रशिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांनी लिंगसमभाव, विविधता आणि महिलांच्या ओळखीचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.

पुण्यातील क्षेत्रीय कार्यकर्त्या अंजू वाघमारे आणि लहानु आबनावे यांनी ग्रामीण भागातील कामाचे अनुभव मांडले.कार्यक्रमाची सुरुवात अपर्णा पाठक यांनी केली, तर आभार प्रदर्शन मुग्धा केसकर यांनी केले.या परिषदेत महिलांना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता विकास प्रक्रियेत नेतृत्व देणारी शक्ती म्हणून पाहणे आवश्यक असल्याचा सर्वसंमत निष्कर्ष नोंदवण्यात आला.