निवडून आलात म्हणजे हवेतील भाषा चालणार नाही; सहर शेख यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा थेट इशारा

महाराष्ट्र

मुंब्रा पालिकेतील एआयएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातील वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सहर शेख यांनी “अहंकारी लोकांना जनतेने कसे हरवले ते पाहिले ना?” अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली होती. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक्स (ट्विटर)वर पोस्ट करत थेट इशारा दिला आहे.

“निवडून आलात म्हणजे हवेत जाऊन कशीही भाषा वापरण्याचा परवाना मिळत नाही. अशा खालच्या पातळीची भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.

रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, “ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांनी कायम शिव–शाहू–फुले–आंबेडकरांची विचारधारा जपली आहे. मात्र काही दिवसांपासून MIM च्या स्थानिक उमेदवारांकडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली जात आहे. निवडणूक लढवण्यासाठी MIM ला फंडिंग कुठून मिळतं आणि हा पक्ष कुणाची बी-टीम म्हणून काम करतो, हे वेगळं सांगायला नको.”

“निवडून आलात तर फालतू गरळ ओकण्यापेक्षा लोकांची कामं करा. आम्ही मात्र कायम आव्हाड साहेब यांच्यासोबत आहोत,” असे ठाम मतही रोहित पवार यांनी व्यक्त केले.

या प्रकरणामुळे मुंब्रा-कल्याण परिसरातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात या वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.