विमान अपघातांत मृत्यू झालेल्या नेत्यांची भयावह मालिका
बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. धावपट्टीवर उतरत असतानाच विमान कोसळून भीषण स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक आणि फ्लाइट अटेंडंट यांचा मृत्यू झाला.
विमान अपघातात राजकीय नेत्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी संजय गांधी (१९८०), माधवराव शिंदे (२००१), वाय. एस. राजशेखर रेड्डी (२००९), गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी (२०२५) यांचाही विमान अथवा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. प्रत्येक वेळी देशभरातून शोक व्यक्त झाला, मात्र अशा दुर्घटनांची मालिका थांबलेली नाही.
अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी “परत या अजितदादा” असा आक्रोश उपस्थित हजारो नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहत होता. मात्र नियतीपुढे कोणाचाच निभाव लागत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २९ वर्षीय फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हिच्या मृत्यूकडे मात्र फारसे लक्ष दिले गेले नाही. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण सर्वच वृत्तवाहिन्यांवर सुरू असताना, पिंकीच्या कुटुंबीयांशी विमान कंपनी किंवा प्रशासनाकडून संपर्क साधला नसल्याने तिच्या वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय नेत्यांकडून खाजगी विमाने, हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड फ्लाइट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वेळेची बचत, गोपनीयता आणि सोयीसाठी हा पर्याय निवडला जात असला, तरी देखभाल, तांत्रिक तपासणी, हवामानाचा अंदाज, वैमानिकांचा अनुभव आणि नागरी विमान सेवा संचालनालयाची परवानगी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
बारामतीत कोसळलेले विमान हे व्हीआरएस एव्हिएशन या खाजगी कंपनीचे असून, याच विमानाला २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर उतरताना अपघात झाला होता. त्यावेळी सर्व प्रवासी बचावले होते, मात्र यंदाच्या दुर्घटनेने गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
देशात यापूर्वीही अनेक दिग्गज नेत्यांचे हेलिकॉप्टर किंवा विमाने कोसळून मृत्यू झाले आहेत. लोकसभा माजी अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी, उद्योगपती ओ. पी. जिंदाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खंडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांसारख्या अनेकांची नावे या यादीत आहेत.
दरम्यान, काही ज्योतिषांनी याआधीच डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या कालावधीत प्रमुख राजकीय व्यक्तींसाठी प्रतिकूल काळ असल्याचे भाकीत केल्याचेही चर्चेत आले आहे. मात्र अपघात ही नियतीची खेळी की मानवी निष्काळजीपणा, याचे उत्तर शोधणे आता अधिक गरजेचे बनले आहे.