फिलिपाईन्समध्ये मराठींचा ठसा; मंत्री जयकुमार रावल यांचा मनिल्यात संवाद, १२ कलमी उपक्रमांची घोषणा

महाराष्ट्र

मुंबई: मराठी समाज जगभर विखुरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने कमी असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले.

मनिल्यात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी भारतीय तसेच मराठी बांधवांशी संवाद साधला. यावेळी प्रवासी मराठी समाजाशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून १२ कलमी उपक्रमांची घोषणा करण्यात आली. यामध्ये जागतिक महाराष्ट्र मंडळांचा डेटाबेस, अधिकृत ई-मेल प्रणाली, डिजिटल माध्यमातून जागतिक महाराष्ट्र दिन साजरा करणे, जागतिक प्रवासी महाराष्ट्र मंडळ स्थापन करणे, स्वतंत्र लोगो व संकेतस्थळ, डिजिटल नोंदणी पोर्टल, आभासी संवाद सत्रे, गुंतवणूक व विद्यार्थ्यांसाठी सिंगल विंडो प्रणाली, एमआयडीसी समन्वय, तक्रार निवारण यंत्रणा, परराष्ट्र मंत्रालय व दूतावासांच्या सहकार्याने विद्यार्थी उपक्रम आणि प्रभावी घोषवाक्य यांचा समावेश आहे.

मंत्री रावल म्हणाले की, मनिला, सेबू आणि दावाओ येथे भारतीय वंशाचे नागरिक आयटी, बीपीओ, आरोग्य व वित्तीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रीय समाजाने आयटी, औषधनिर्मिती, सल्लागार सेवा आणि उद्योजकता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत-फिलिपाईन्स संबंध अधिक मजबूत होत असून आयटी, डिजिटल अर्थव्यवस्था, अक्षय ऊर्जा, संरक्षण सहकार्य आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्र हे औद्योगिक व वित्तीयदृष्ट्या अग्रगण्य राज्य असून फिलिपाईन्सला आसियान प्रदेशाचे प्रवेशद्वार मानून सहकार्य वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी नागपूरचे नरेंद्र सिंगरू व रमोलाआईक सिंगरू यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमालाही मंत्री रावल उपस्थित होते. कार्यक्रमास भारताचे मनिलातील राजदूत हर्ष कुमार जैन, प्रथम सचिव निलेश कुमार राय, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी, प्रवासी मराठी समाजाला राज्याच्या विकासात महत्त्वाचा भागीदार मानत व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचे आवाहन मंत्री रावल यांनी केले. तसेच सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या.