मुंबई: चीनच्या सीमेवरील कारवायांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही मोदी सरकारने त्यांना बोलू दिले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करत सरकारवर संसदेच्या नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, “देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या ‘फोर स्टाफ ॲाफ डेस्टिनी’ या पुस्तकात ‘डंके की चोट’ प्रकरणावर लिहिले असून, मोदी सरकारने यावर जाबबादारी घेतली नाही, हा मुद्दा राहुल गांधी मांडत होते. चीन प्रकरणावर संसदेत चर्चा होणे आवश्यक आहे, पण सरकारने विरोधी पक्ष नेत्याला बोलूच दिले नाही.”
सपकाळ यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरही बोलून मोदी सरकारच्या कारवायांची टीका केली. वांगचुक यांनी चीनच्या भारतात प्रवेशाच्या मुद्द्यावर आवाज उठवला होता; त्यावरही त्यांना तुरुंगात टाकल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
अजित पवार विमान अपघातावर शंका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले, “अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे, परंतु ब्लॅकबॉक्समधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही आणि चौकशीही होत नाही. त्यामुळे संशय वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर गंभीर दखल घेतलेली नाही. अपघाताच्या चौकशीसाठी घाई केली गेली नाही, जे आश्चर्यकारक आहे.”सपकाळ म्हणाले की, “अजित पवारसारख्या शिस्तप्रिय नेत्याचा अपघात होणे पटत नाही. जोपर्यंत अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही, तोपर्यंत प्रश्न कायम राहतील.”
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. कोयता गँग, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, आका, खोके आणि बिश्नोई गँग या प्रकरणांमागे सरकारचीच निष्क्रीय भूमिका आहे.”