बार्शीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा! विकासकामे व शेतकऱ्यांचा पहिला हक्क

महाराष्ट्र

सोलापूर: राज्याच्या तिजोरीवर सर्वप्रथम अधिकार शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत त्यांनी सांगितले की, सरकारने सुरू केलेल्या योजनांचा प्रवाह अखंड राहील, कोणतीही योजना बंद होणार नाही.

सभेत त्यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या कामाची स्तुती करताना म्हटले, “सहा-सात वेळा निवडून येणं योगायोग नाही, तर वर्षानुवर्षांच्या कामाची पोचपावती आहे. सोपल साहेब सर्वांचे मित्र आहेत, शत्रू कोणाचा नाही.”कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर भर देत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवून देणारा खरा कणा म्हणजे कार्यकर्ता. मी जरी उपमुख्यमंत्री असलो, तरी मी मुळात कार्यकर्ता आहे.”

सरकारच्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी प्रवासात ५०% सवलत, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी १००% फी माफी, शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना यासारख्या योजनांमुळे जनतेला थेट फायदा मिळत आहे. एका मुलीच्या आत्महत्येनंतर लगेच १००% फी माफी लागू करून सरकारने संवेदनशीलता दाखवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांविषयी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “शेतकरी हा राज्याचा मायबाप आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करणे हा आमचा निर्धार आहे.” त्यांनी सिंचन, उपसा योजना, अपर तहसील कार्यालय उभारणी यासाठी तातडीचे निधी उपलब्ध करणार असल्याचे आश्वासन दिले.

तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला. “तरुणांनी नोकरीसाठी मुंबई, ठाणे, पुण्याकडे जाण्याची गरज नाही; एमआयडीसी स्थापन करून इथेच रोजगार मिळेल,” असे स्पष्ट केले.वैराग नगरपंचायतीसाठी विकासकामांची घोषणा करत त्यांनी रस्ते व गटारींसाठी २० कोटी, वैकुंठ स्मशानभूमीसाठी ५ कोटी, सीसीटीव्हीसाठी २ कोटी आणि नवीन इमारतीसाठी ७ कोटी निधी मंजूर केले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

सभेत त्यांनी जोर देऊन सांगितले, “आम्ही मालक नाही, सेवक आहोत. खरे मालक जनता आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. एकदा शब्द दिला की मागे फिरत नाही.”सभेच्या शेवटी त्यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या कार्याची प्रशंसा करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.या सभेला सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.