भावना नव्हे तर विकास जिंकला; मुंबईतील नगरसेवकांना शिंदेंचा संदेश

महाराष्ट्र

सत्ता म्हणजे विकास, त्यात भेदभाव नको;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरसेवकांना स्पष्ट संदेश

मुंबई: वॉर्डच्या विकासासाठी सत्तेचा योग्य वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने काम करा, असे ठाम निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले.

मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये शिवसेनेच्या 29 नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधताना त्यांनी विकास, स्वच्छता, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख प्रशासनावर भर दिला. नगरसेवकांच्या कामातून शिवसेनेची प्रतिमा स्वच्छ, विश्वासार्ह आणि लोकांच्या मनात सकारात्मक राहिली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रभागात प्रत्यक्ष बदल दिसला पाहिजे

शिंदे म्हणाले, आपल्या प्रभागात प्रत्यक्ष बदल दिसला पाहिजे. स्वच्छता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. रोज सकाळी साफसफाई झाली आहे की नाही, याची पाहणी करा. खड्डे, कचरा, नाल्यांतील अडथळे तात्काळ दूर झाले पाहिजेत. ‘डीप क्लीन ड्राइव्ह’सारखे उपक्रम प्रभावीपणे राबवावेत.

महिला सक्षमीकरणावर भर

या निवडणुकीत 19 ‘लाडक्या बहिणी’ विजयी झाल्याचा विशेष उल्लेख करत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. महिला बचत गटांना 20 ते 30 हजार रुपयांचा रिव्हॉल्विंग फंड देण्यात येणार असून, ‘लाडक्या बहिणीं’ना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश

पुनर्विकास, एसआरए आणि रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्या. ओसी (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) प्रलंबित असलेल्या इमारतींचे प्रश्न मार्गी लावा. घराचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळल्यास नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे शिंदे म्हणाले.

प्रत्येक वॉर्डमध्ये मोठी विकासकामे अपेक्षित

प्रत्येक वॉर्डमध्ये किमान दोन ते तीन मोठी विकासकामे उभी राहिली पाहिजेत. मार्केट, अभ्यासिका, दवाखाने यांसारखी कामे नागरिकांना प्रत्यक्ष बदल जाणवतील अशी असावीत. सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांना विकासकामे सुरू असल्याचे दिसले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा कौल

विरोधकांनी भावनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, तर शिवसेनेने विकासाला प्राधान्य दिले. जनतेने भावनिकतेपेक्षा विकासाला मतदान केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.या कार्यक्रमाला शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, सचिव संजय मोरे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.