महापौर-उपमहापौर निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

महाराष्ट्र

शिवसेना–एमआयएम एकत्र येण्याची शक्यता, गुप्त बैठकींनी चर्चांना उधाण

मालेगाव: महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शनिवारी (दि. ७) होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले असून घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी (दि. ५) एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि माजी महापौर तथा एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.

या भेटीत महापौर-उपमहापौर निवडीसंदर्भातील रणनीती ठरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या चर्चांबाबत शिवसेना व एमआयएमच्या नेत्यांनी अधिकृत मौन बाळगले आहे. कट्टर मुस्लिम एमआयएम आणि हिंदुत्ववादी शिवसेना महापौर व उपमहापौर निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

हॉटेलमध्ये गुप्त बैठक

एमआयएमने महापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली असली, तरी उपमहापौरपदासाठी आमदार पुत्र हाफिज अब्दुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर निवडणुकीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांची गुरुवारी (दि. ५) मुंबई–आग्रा महामार्गालगत पाटणे शिवारातील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती आहे.

या बैठकीत शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार लता घोडके यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी एमआयएमचे नगरसेवक आणि आमदार मौलाना मुफ्ती यांच्या सतत संपर्कात असल्याचीही चर्चा आहे.

निवडणुकीत रंगत

महापौर व उपमहापौर निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून स्पष्ट होत आहे. मालेगाव सेक्युलर फ्रंटकडून महापौरपदासाठी नसरीन शेख आणि ताहेरा शेख, तर उपमहापौरपदासाठी शान-ए-हिंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी लता घोडके, तर उपमहापौरपदासाठी नीलेश काकडे आणि नरेंद्र सोनवणे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. एमआयएमने उपमहापौरपदासाठी हाफिज अब्दुल्ला यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रचारसभा आणि कॉर्नर बैठकींमुळे राजकीय वातावरण तापले होते. गुरुवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आल्या आहेत.