मुंब्रा: ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नव्या नगरसेविका सहर शेख यांच्या विजय भाषणातील “पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करू” या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
२२ वर्षीय सहर शेख यांनी निवडणूक विजयाच्या आनंदात केलेल्या या वक्तव्याचा अर्थ धार्मिक असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. भाजपसह काही संघटनांनी या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी सहर शेख यांना समज देत नोटीस बजावली.
नोटिशीला उत्तर देताना सहर शेख यांनी आपला खुलासा दिला असून, “हिरवा” हा शब्द त्यांनी AIMIM पक्षाच्या झेंड्याच्या रंगाच्या संदर्भात आणि पर्यावरणपूरक विकास, वृक्षलागवड यासाठी वापरला असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप महाराष्ट्राचे सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी सहर शेख यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची भाषणे करताना जबाबदारीने बोलले पाहिजे. महाराष्ट्राची ओळख तिरंग्याशी आहे, कोणत्याही एका रंगाशी नाही.”
या संपूर्ण प्रकरणामुळे मुंब्रा परिसरात राजकीय वातावरण तापले असून, रंग, धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ होऊ नये, अशी मागणी विविध सामाजिक घटकांकडून केली जात आहे. लोकप्रतिनिधी हे कोणत्याही धर्माचे नसून ते सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी असतात, त्यामुळे भाषणात संयम आणि संविधानिक मूल्यांचे भान राखावे, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे.या प्रकरणावर पुढील कायदेशीर कारवाई होणार की प्रकरण शांत होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.