कसब्यातील विजयानंतर शिंदे – फडणवीसांवर जयंत पाटील यांचा हल्लाबोल…

महाराष्ट्र

मुंबई: ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचाच उमेदवार कसबा निवडणुकीत विजयी होत होता याची आठवण करून देतानाच चिंचवड पोटनिवडणूक आमचा भलेही पराभव झाला असला तरी विरोधात पडलेली मते एकत्र केली असती तर भाजपचा तिथेही पराभव झाला असता असेही जयंत पाटील म्हणाले.

फडणवीस – शिंदे यांची जी युती झाली आहे त्याबाबत राज्यातील जनता प्रचंड नाराज आहे हे कसबा निवडणुकीतून समोर आले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.