मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेतले जाणार नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसावर तात्काळ कारवाई करून त्याला सेवेतून बडतर्फ व अटक करण्याचीही त्यांनी मागणी केली.
या पार्श्वभूमीवर सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाही तसेच आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अडवणे व धक्काबुक्कीच्या घटना तातडीने थांबवाव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, पोलिसांनी कायद्यानुसार वागावे, सरकारचे हस्तक असल्यासारखे वर्तन करू नये. विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाची चौकशी करून कठोर कारवाई करावी. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू असून अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना आवश्यक सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
पेपरफुटी प्रकरणी देशभरातील तरुणांमध्ये संताप असून काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन सुरू असल्याचे सपकाळ म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. या मुद्द्यावर महाविकास आघाडी लवकरच बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अण्णा हजारे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, “कुंभकर्ण जागा झाला आहे. अण्णा हजारे आता पुन्हा झोपी जाऊ नयेत,” अशी टीकाही सपकाळ यांनी केली.