जनादेशाचा बाजार, संविधानावर घाव; पक्षफोडीच्या राजकारणावर काँग्रेसची टीका

महाराष्ट्र

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी जनादेशाची पायमल्ली, पक्षफोडीचे राजकारण आणि संविधानिक संस्थांच्या भूमिकेबाबत भाष्य करत सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका केली आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून जनतेच्या विश्वासाची आणि जनादेशाच्या पवित्रतेची व्यवस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘ऑपरेशन लोटस’ आणि ‘ऑपरेशन टायगर’सारख्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची फोडाफोड करून सत्तेची समीकरणे बदलण्याच्या प्रवृत्तीवर आक्षेप घेतला. निवडणुकीनंतर पैसा, पदे आणि इतर प्रलोभनांच्या आधारे जनादेश बदलण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या आत्म्यावर घातलेला घाव असल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षांतरबंदी कायद्याचा उद्देश जनादेशाचे संरक्षण करणे हा असला तरी निर्णय प्रक्रियेतील विलंब, अपात्रतेच्या प्रकरणांवरील कारवाईचा अभाव आणि न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईमुळे या कायद्याची प्रभावीता कमी झाल्याची टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत बिक्कड यांनी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नांमुळे लोकशाही कमकुवत होत असल्याचा आरोप केला. मतदार केवळ व्यक्तीला नव्हे तर पक्ष, विचारसरणी आणि नेतृत्वालाही मतदान करत असतात. त्यामुळे पक्ष बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जाण्याची तयारी दाखवावी, असे ते म्हणाले.

लोकशाहीची खरी ताकद निवडणुकीत नसून जनादेशाच्या सन्मानात आहे. सत्तेसाठी जनादेशाशी तडजोड करण्याची प्रवृत्ती वाढल्यास लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कमी होईल, असा इशाराही त्यांनी दिला. जनादेशाचा सन्मान राखत लोकशाही अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या लेखातून अधोरेखित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत