मॉलमधील वाईन विक्रीबाबत शंभूराजे देसाईंच्या वक्तव्यानंतर तृप्ती देसाई आक्रमक…

महाराष्ट्र

औरंगाबाद: मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईन विक्री सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच सरकार जर महसूल वाढवण्यासाठी तरुणांना व्यसनाधीनतेकडे नेणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

तृप्ती देसाई म्हणाल्या, जेव्हा महाविकास आघाडीने मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला तेव्हा भाजपने आणि आमच्या सारख्या काही संघटनांनी याला विरोध करत सरकारला हा निर्णय मागे घ्यायला लावला होता. पण आता पुन्हा शिंदे गट आणि भाजपचे सरकार आलं असताना वाईन विक्री बाबत प्रतिक्रिया यायला लागल्यात. यामध्ये शेतकऱ्यांचे कसले हित आहे? असा सवाल करत तुम्ही उत्पादन शुल्क मंत्री म्हणून महसूल कमवण्याकडे बघताय असा थेट आरोप त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केला.

वाईन मुळे अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते तसेच ते व्यसनाधीन होऊ शकतात. मॉल मध्ये वाईन विक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाहीच. सर्वसामान्य नागरिकांनीही याला विरोधच केला आहे. शेतकऱ्याला पीक पिकवण्यासाठी पाणी लागत, वाईन नाही लागत, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असं सांगून स्वतःला महसूल मिळावा यासाठी तरुणांना व्यसनाधीनतेकडे जर कोणतं सरकार घेऊन जाणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.