उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेवटच फोनवर कोणाशी बोलण झाल…

महाराष्ट्र

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रासह देशभरातून तीव्र शोक व्यक्त केला जात असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशासनावर मजबूत पकड, निर्णयक्षमता आणि लोकहिताची जाण असलेला कर्तबगार नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने एक दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर केली असून, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, या विमान अपघाताच्या सुमारे ३० मिनिटे आधी अजित पवार यांनी आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला होता. याबाबतची माहिती स्वतः राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. नेहमीप्रमाणे अजित पवार यांनी आपुलकीने चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेनंतर आ. राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी तीव्र भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

“आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. काका म्हणूनच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले, “राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणे आणि निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणे, हे त्यांच्या सहवासातून नेहमी शिकायला मिळाले. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे ते माझ्यासाठी कायम प्रेरणास्थान राहिले.”

अपघाताच्या काही वेळ आधी झालेल्या शेवटच्या फोन संभाषणाची आठवण अजूनही मनात घुमत असल्याचे सांगत, “क्षणार्धात आयुष्य संपते, याची ही भीषण जाणीव मन सुन्न करणारी आहे. अजितकाका आपल्यातून गेले, हे अजूनही स्वीकारणं कठीण आहे,” असेही त्यांनी म्हटले.

“या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा कृतिशील नेता आपण गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे,” अशा शब्दांत राणाजगजितसिंह पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.