sharad pawar

शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात…

राजकीय

कराड (सातारा): अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक तीर्थक्षेत्र असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडे यांच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे.

कोणताही संभ्रम नको, जाहीरपणे पक्षबांधणीसाठी जात असल्याचे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, ज्यांच्याकडून संघटन मजबूत करावी अशी अपेक्षा होती. मात्र काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे नव्या पिढीतील कार्यकर्ता नाऊमेद होऊ नये म्हणून मी हा दौरा सुरू केला आहे. कार्यकर्ते आणि त्यातीलही 70-80 टक्के तरूण आमच्या पाठीशी आहेत, हे चित्र आहे. आम्ही कष्ट केले, या तरूणांना दिशा दिल्यास मला खात्री आहे दोन ते तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र राष्ट्रवादीला अनुकुल होईल.’

एखादी महत्वाची मोहिम सुरू करण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चांगला दिवस असतो. म्हणून आज यशवंतरावांच्या स्मृतींना वंदन करून मी ही मोहिम सुरू केली. भाजपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता. सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न ही आमची अपेक्षा होती. ज्या प्रवृत्तींशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेले. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

‘मी जाहीरपणानं पक्षाच्या बांधणीसाठी निघालो आहे, त्यावरून संभ्रम निर्माण करू नका. महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीने ज्यांना पक्षाचं नेतृत्व दिले ते जयंत पाटील आहेत. त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असले, पत्रव्यवहार केला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. अडीच वर्षं आम्ही शिवसेनेबरोबर काम केले तेव्हा त्यांना वाटलं नाही की आम्ही काही चूक करत आहोत,’ असेही शरद पवार म्हणाले.

शिरूरकरांची प्रतिक्रिया! आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत आज बसण्याची वेळ आली…