‘भटकलेले पक्षी पुन्हा घरट्यात परतले’; जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर युवक अध्यक्ष विरु वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरु वाघमारे आणि हेमंत वाणी यांनी अजित पवार गटाची साथ दिली होती. मात्र, ठाणे शहरातील नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला. या पक्षप्रवेशाला डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाची भेट असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
पक्षप्रवेशानंतर विरु वाघमारे म्हणाले, “डॉ. जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. मनोज प्रधान आणि अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालतात. त्यामुळे आम्ही पुन्हा स्वगृही परतलो आहोत. अखेर निजामाच्या तावडीतून सुटका झाली.”
यावर प्रतिक्रिया देताना डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भटकलेले पक्षी पुन्हा आपल्या घरट्यात परततात. विरु वाघमारे आणि हेमंत वाणी हे पुन्हा आपल्या परिवारात आले आहेत. विशेष म्हणजे, विरुला त्याच्या आईनेच परत पाठवले.”
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर विरु वाघमारेंसह शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यात अजित पवार गटाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा असून, शरद पवार गटाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे.