शिरुर: शिरुर तालुक्यात टाकळी हाजी व जांबुत येथील ग्रामपंचायतचे विभाजन होवून नव्याने माळवाडी, म्हसे, शरदवाडी अशी नवीन स्वतंत्र गावे तयार झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या टाकळी हाजी, जांबूत सह नव्याने तयार झालेल्या या ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
टाकळी हाजी व जांबुत येथील पहिल्या कार्यकारी मंडळाचा कालावधी संपून जवळपास अडीच वर्षे या पंचायतींच्या कारभारासाठी प्रशासक नेमण्यात आले होते. या भागातील ग्रामपंचतीच्या निवडणुकीवर जिल्हा परिषद, पंचायत समितीची अनेक बेरजेची समीकरणे अवलंबून आहे. राष्ट्रवादीतील माजी आमदार पोपटराव गावडे विरुद्ध माजी सरपंच दामुशेठ घोडे यांच्या २ गटात सरपंच पदासाठी मोठा संघर्ष होऊन जोरदार लढत होणार आहे. या दोघांनी एकत्र येवून निर्णय घेतल्यास ही निवडणुक बिनविरोध होवू शकते.
परंतू या दोघांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने अनेक दिवसापासून त्यांच्यात जमत नसल्याने एकमेकांविरोधात जोरदार टिकाटिप्पणी सुरु आहे. तसेच ते एकमेकांच्या कार्यक्रमातही हजर राहत नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे यांनी (दि. ८) जुलै रोजी दोघांचीही टाकळी हाजी येथे पदाधिकाऱ्यां समवेत भेट घेतली असून त्यांची एकमेकांविषयीची गाऱ्हाणी ऐकली आहे. बंड थंड करण्यात वळसे पाटील यशस्वी होतात का? हे आता येणारा काळच ठरवणार आहे.
सामान्य नागरीकांकडून या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त होत असल्या तरी नव्याने गुढग्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रणांगणात तयार असलेल्या राजकारणात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढल्याने असे काही घडेल असे वाटत नसल्याची व दोघांच्या भांडणात उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांकडून तीसरी आघाडी ही तयार होणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.
माजी आमदार पोपटराव गावडे व माजी सरपंच दामुशेठ घोडे यांचे समर्थक एकमेकांना भिडण्याची तयारी करुन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. तरुणाई राजकारणासाठी सज्ज झाल्याने बिनविरोध साठी समझोता होईल की जाणकार आणि नवोदित असे दोन गट तयार होतील हे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. एकंदरीत परिस्थिती पाहता दोन्हीही गटाकडून पूर्वतयारी सुरू झाली असून ग्रामपंचायतच्या निकालावर पुढील जिल्हा परिषद, पंचायत समितीची राजनिती ठरणार असल्याने बडे नेते पुर्ण ताकतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.