चौकशी लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न: जयंत पाटील

राजकीय

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी  आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan
महाविकास आघाडीचे सरकार असताना परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. तेव्हा या महाराष्ट्रात पवारसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे ही गोष्ट जाणवली होती. एक मोठा विचार आपल्याकडे आहे. या आधारावर आपल्याला ही संघटना फार व्यापक करता येईल. यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे, लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या, क्रियाशील कार्यकर्ते आपल्या भागात तयार करा, आपापसातील वाद बंद करा आणि आपली संघटना मजबूत करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
बुथ कमिट्या पूर्ण करा, संघटना सक्षम करा, सदस्यता नोंदणी पूर्ण करा. आपल्या पक्षाची वाढ कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असे आदेश देतानाच जळगाव जिल्ह्यातील आपल्या अनेक उमेदवारांची थेट लढत ही शिवसेनेशी होती. शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. पक्षांतर केलेले लोकांना कधीही आवडत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात या आमदारांप्रती मोठा राग आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल सत्ताधाऱ्याच्या विरोधात गेल्यास काही महिन्यातच निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण संघटनात्मक बांधणी करत राहिले पाहिजे. आपले घड्याळ घराघरात पोहोचले पाहिजे असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.
गुरुवारी राज्याचे अधिवेशन संपले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त होते. सरकार लक्ष देत नव्हते आम्ही सभागृहात संघर्ष केला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यास भाग पाडले. त्यामुळे आता तुम्हीही जोमाने संघर्ष करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. जळगाव येथे ज्या सूचना आल्या त्या सुचनांचा नक्कीच विचार केला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
…तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार: एकनाथ खडसे
एकनाथ खडसेंच्या मागे सर्व यंत्रणा लावल्या आहेत. मिळेल ती चौकशी करत आहे, प्रचंड छळवणूक केली जात आहे. तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार असे ठणकावून सांगतानाच हे सगळे बदनाम करण्याचे कारस्थान आहे. आम्ही याला भीक घालत नाही असा स्पष्ट इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.
या भागात आमदार निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारीला लागायला हवे, संघटनेचा पाया मजबूत करायला हवा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता हस्तगत करायला हवी तेव्हा आपल्याला लोकहिताचे काम करून आपले आमदार निवडून आणू शकतो असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी मांडले.
एक काळ होता काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता. काँग्रेस लोकांच्या संपर्कात गेली आणि सर्व वातावरण ढवळून निघाले. आपल्यालाही तेच करावे लागेल. लोकांशी एकरूप व्हायला हवे. मतदारांच्या दरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा. ‘एक बूथ तीस युथ’ सारख्या संकल्पना राबवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा आणि त्यांंना आपल्या पक्षाचा सदस्य बनवून घ्या. सर्वसमावेशक कार्यकारिणी तयार करा असेही एकनाथ खडसे म्हणाले.
या जिल्ह्यात राष्ट्रवादी एकटी आहे. आपल्या विरोधात सर्व विरोधक आहेत पण आपण पुरून उरणार असल्याचे स्पष्ट करतानाच शरद पवार आजतागायत लढत आहेत. अहंमपणा विसरून जर आपण काम केले तर निश्चित लोकं तुमच्या मागे उभा राहणार आहेत असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जयंत पाटील हे ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. पदाधिकारी जर असा कर्तव्यदक्ष राहिला तर नक्कीच आपली संघटना एका विशेष टप्प्यावर येईल अशा शब्दात जयंत पाटील यांचे विशेष कौतुक एकनाथ खडसे यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा व पक्षाच्या अडचणी सांगितल्या. यावेळी आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, रोहिणीताई खडसे, संतोष चौधरी, मनिष जैन, जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, दिलीप सोनवणे, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष अशोक वंजारी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.