राज्यात ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना मदतीची गरज, पण कृषिमंत्री गायब; आदित्य ठाकरे

राजकीय

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं. कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही.

ओला दुष्काळ जाहिर करण्याची वेळ असताना कृषीमंत्री कुठे दिसत नाहीत. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना कृषिमंत्री आणि घटनाबाह्य सरकार गायब असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारमध्ये महिला सुरक्षित नसल्याचं गंभीर मत व्यक्त केलं. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ११ नोव्हेंबरला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची घोषणा केली.

आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना राज्यात हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचं प्रयत्न सुरू असल्याची चिंता व्यक्त केली. सरकारविरोधात कोणी बोललं तर त्याच्यावर कारवाई केली जात आहे. कोणी काही बोललं की चौकश्या लावा, तुरुंगात टाका, तडीपार करा…हे सगळं चाललं आहे ते हुकूमशाहीच्या दिशेने जात आहोत; किंबहुना हुकूमशाही आलेलीच वाटत आहे.

सभेला परवानगी नाकारता, सुषमा अंधारेना परवानगी नाकारता, किशोरी पेडणेकर यांना छळता, ऋतुजा लटकेंना छळलं… महिलांचा छळ सुरु आहे. आज राजकीय लोकांना सतावत आहेत. उद्या पत्रकारांना देखील छळतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.