शिरुर तालुक्यात दिव्यांगाना रेशनच धान्य मिळेना, मनमानी कारभार सुरु…

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील पुरवठा विभागाची लक्तरे काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वेशी वरती टांगली गेली असून दिवाळी संपली तरीही शिरूर तालुक्यातील काही हेकेखोर रेशनिंग दुकानदार व अधिकाऱ्यांच्या अभद्र वृत्तीमुळे नागरिकांना रेशनिंग पासून वंचित राहावे लागले आहे. तर काही दिव्यांग नागरिकांना रेशनिंग दुकानदाराच्या मुजोर प्रवृत्ती मुळे रेशनिंग उपलब्ध झाले नाही.

याबाबत संबंधितांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पुरवठा अधिकाऱ्यांनी ही संबंधित दिव्यांगास रेशनिंग उपलब्ध होईल अशी काहीही उपाययोजना केली नाही उलट रेशनिंग दुकानदाराचीच पाठराखण केली. त्यामुळे संबंधित रेशनिंग दुकानदाराला योग्य ती समज द्यावी अशी लेखी मागणी करुन ही अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याने संबंधित पुरवठा अधिका-याने आर्थिक हितसंबंधामुळेच रेशनिंग दुकानदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप दिव्यांग नागरिक खंडेराव गोरडे यांनी केला आहे.

वाघाळे येथील खंडेराव गोरडे हे त्यांच्या भावा समवेत रेशनिंग आणण्यासाठी गेले असता रेशनिंग वाटपाची मुदत संपली असल्याचे रेशनिंग दुकानदार अशोक थोरात यांनी सांगितले व रेशनिंग दिले नाही. याबाबत खंडेराव गोरडे यांनी पूरवठा अधिकारी अतुल गायकवाड यांना या बाबत माहिती देऊन लेखी तक्रार केली आहे. मात्र गेल्या महिनाभरात पूरवठा अधिकारी अतुल गायकवाड हे रेशनिंग दुकानावर आलेच नाहीत. व दिव्यांग खंडेराव गोरडे यांच्या अर्जाची दखल ही घेतली नाही. एरवी तक्रारी ची दखल घेऊन कारवाई करतो म्हणणारे पुरवठा अधिकारी अतुल गायकवाड संबंधित दुकानदारावर कारवाई करताना शांत का? असा सवाल निर्माण झाला आहे.

जर पुरवठा विभागाने संबंधित रेशनिंग दुकानदारावर कारवाई केली नाही. तर अधिका-याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा प्रहार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब नवले यांनी दिला आहे.