शिरूर (अरुणकुमार मोटे): मळगंगा कुंडात पडून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली असतानाही, पोलिस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृतदेह तब्बल अनेक तास कुंडातच पडून राहिलाआहे. नगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेच्या वादात पारनेर पोलिस व शिरूर पोलिसांनी जबाबदारी झटकत कारवाईस टाळाटाळ केल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शिवा दाराभाऊ ठाकरे (वय २८ वर्षे) असून तो ऊसतोड मजुराच्या कामासाठी परिसरात आला होता. काल (दि. १२) दुपारी साधारणतः २ वाजता तो मळगंगा कुंडात बुडाल्याचे निदर्शनास आले. मृतदेह काही तासांनी फुगून पाण्यावर आला असतानाही, दोन्ही पोलीस ठाण्यांनी जबाबदारी झटकून दुर्लक्ष केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईक व ग्रामस्थांनी दोन्ही पोलीस ठाण्यांना वेळेवर कळवूनही, प्रशासनाकडून कोणतीही तातडीची मदत मिळाली नाही. कोणाच्या हद्दीत प्रकरण येते यावरच चर्चा करत, पोलिसांनी मदत करण्याऐवजी हात झटकले. परिणामी नातेवाईकांनी हताश होऊन मदतीसाठी इतर पर्याय शोधावे लागले.
घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ व नातेवाईकांचा रोष इतका वाढला की, त्यांनी पोलिस प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याआहेत. “मानवी जीव गेला तरी पोलिसांना फक्त हद्दीचा वाद महत्त्वाचा वाटतो का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.
ही बाब म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस असून, या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानवी संवेदनांचा अभाव आणि जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आली आहे.
स्थानिक प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांकडून होत आहे. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी हद्दीच्या वादांवर स्पष्ट मार्गदर्शक नियम लागू करण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.