रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेल्या 10 ते 11 वर्षांपासून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय परिपत्रकाप्रमाणे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी साजरी करण्याबाबत मातंग नवनिर्माण सेना सातत्याने पाठवापुरावा करत असुन याबाबत पुन्हा एकदा याबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राज्यपाल महोदयांच्या आदेशाप्रमाणे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी जयंती साजरी करण्याबाबत उदासीनता दिसून येते. मागील वर्षी अनेक ठिकाणी जयंती साजरी न झाल्याचे पुरावे संघटनेकडे असताना मातंग नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रार करुनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरुन संबंधित कार्यालयास पत्रव्यवहार करुन जयंती साजरी करण्याबाबत पूर्व सूचना देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

तसेच जर यावर्षी जाणून-बुजून कोणी जयंती साजरी केली गेली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपल्या कार्यालयाच्या बाहेर उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हस्कु आण्णा शेंडगे, राज्य सचिव लक्ष्मण मांढरे, काळूराम शेंडगे, अजय वाल्हेकर, सागर लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते.