घोड धरणातून नदीपात्रामध्ये पाच हजार क्युसेकने विसर्ग

शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके): चिंचणी (ता. शिरुर) घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला होता. मात्र घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आहुपे खोऱ्यात मागील ८-१०दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील वडज, येडगाव धरणातून खाली घोड धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामधून सुमारे घोड धरणात ७५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे येथील घोड धरणातून नदीपात्रात नुकतेच पाच हजार २०० क्युसेकने पाणी सोडले असल्याची माहिती शाखा अभियंता किरण तळपे यांनी दिली.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

दरम्यान, घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र धरणातून पाणी सोडल्यामुळे आता काही प्रमाणात ऊस लागवडीला गती येईल. अद्यापही वडज, येडगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून ज्या प्रमाणात वरुन पाणी येईल त्याप्रमाणे घोडमधून खाली नदीपात्रात पाणी सोडले जाईल. आहुपे खोऱ्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रात विसर्ग सोडला आहे. धरणामध्ये सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढू शकतो. दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या नागरिकांनी शेतीपंपाची काळजी घ्यावी, असे आवाहन घोड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, घोड धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून धरणातील पाणी साठवण क्षमता कमालीची गाठली आहे, असा अहवाल नाशिक येथील मेरी संस्थेनी यापूर्वीच दिला आहे. मात्र गाळ काढण्याबाबत ठोस निर्णय होत नाही.