पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुणे जिल्ह्यात पुणे ग्रामीण पोलिस दलातील पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पुणे ग्रामीण मधील अनेक पोलिस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. तसेच पुणे शहराचे पोलिस आयुक्त यांच्यासहीत पुणे शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांच्याही एकाच पोलीस स्टेशनला अधिक कार्यकाळ झाल्याने बदल्या करण्यात आल्या.

 

त्याच पार्श्वभुमीवर पुणे ग्रामीण पोलिस दलात एकाच तालुक्यात अनेक वर्षे कार्यकाळ पुर्ण झालेल्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने एकाच तालुक्यात अनेक वर्षे ठाण मांडलेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी होणार…? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरात कार्यकाळ पुर्ण झालेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या त्याच पार्श्वभुमीवर पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण पोलिस दलातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणार का हे येणाऱ्या काही दिवसातच दिसणार आहे.

 

पुणे शहरात नुकतेच शहर पोलिस आयुक्त म्हणुन अमितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारताच पुणे शहरातील सर्व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना बोलावून घेत कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत तसेच सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उद्दातीकरण न करण्याबाबत कडक शब्दात सुचना देत कान टोचले. तसेच पुणे शहरात एकाच पोलिस स्टेशनला अनेक वर्षे काम करणाऱ्या अंदाजे 500 कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या शहर अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

 

त्याच धर्तीवर पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस दलात एकाच तालुक्यात अनेक वर्षे वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला काम करणाऱ्या पोलिस कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणार कां…? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात अंदाजे 250 ते 300 कर्मचाऱ्यांची एकाच तालुक्यात सुमारे 13 ते 15 वर्षे नोकरी झाली असुन शिरुर तालुक्यात सुमारे 25 ते 30 कर्मचाऱ्यांची सुमारे 13 ते 15 वर्षे नोकरी झालेली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बदल्या तालुक्याबाहेर कधी होणार अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा चालु आहे.