जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड! भर चौकात पती-पत्नीची केली निर्घृण हत्या…

क्राईम महाराष्ट्र

धाराशिव: धाराशिव तालुक्यातील करजखेड पाटोदा चौकात सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या जुन्या वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याचं उघडकीस आल. आरोपी जीवन चव्हाण आणि त्याचे वडील हरिबा चव्हाण यांच्यासह अन्य काही हल्लेखोरांनी पती-पत्नीची निर्घृण हत्या केली. सहदेव पवार आणि प्रियांका पवार असं हत्या झालेल्या पती-पत्नीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सहदेव पवार आणि आरोपी जीवन चव्हाण हे शेजारीच राहतात. पेशाने ते शेतकरी आहेत. पवार यांच्या नावावर 36 एकर तर चव्हाण यांच्या नावावर 2 एकर जमीन आहे. संपत्तीबाबत दोघांमध्ये नेहमीच वाद-विवाद होत होते. काही वर्षांपूर्वी सहदेवने जीवन चव्हाणला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सहदेवला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

सहदेव जामिनावर सुटला अन् घडलं भयंकर..

परंतु, उच्च न्यायालयाने त्याला जामीन काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. 15 दिवसांपूर्वीच सहदेवची तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर तो गावी परतला होता. आज बुधवारी दुपारच्या सुमारास करंजखेडा येथील लोहारा रस्त्यावर या आरोपींनी सहदेव आणि प्रियांका यांना गाडीने धडक दिली. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. तर प्रियांका पवार यांचा गळा चिरून हत्या केली. सहदेवला धारशिवला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

सहदेव पवारवर याआधी 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण जामीनावर सुटल्यावर सहदेववर आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात ठेऊन हल्ला केला. सहदेवची पत्नी प्रियांकाचाही खून करण्यात आला. मृत दाम्पत्याला दोन मुली आहेत. एक मुलगी पहिलीत शिकते. तर दुसरी मुलगी तिसरी इयत्तेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड आणि पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या टीमकडून पुढील तपास सुरु आहे.