घोड धरणातुन २० हजार क्युसेसने नदीपात्रात विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सध्या धरणातुन नदीपात्रात एकुण २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत असल्याची माहिती घोड पाटबंधारे विभागाचे उप अभियंता महेश शिंदे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठी न जाण्याचे आवाहनही प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.

आज दि २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता घोड धरण प्रशासनाने सांडव्यावरुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात ७ हजार क्युसेक्सने वाढ केली असुन या वाढीव विसर्गामुळे सध्या धरणातुन नदीपात्रात एकुण २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे घोड नदीच्या पात्रातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.