अत्याधुनिक शेतीचा आदर्श नमुना; समाधान इचके यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार 2025′

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा 2025 पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्यात शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील तरुण प्रगतिशील शेतकरी समाधान श्रीरंग इचके यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश रामदास विटकर, रुद्रायणी अॅग्रो इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुहास बळी व कृषितज्ज्ञ अधिकारी एस. एस. सावंत यांच्या हस्ते इचकेंना प्रदान करण्यात आला.

समाधान इचके यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पॉलीहाऊस शेतीचा प्रारंभ केला. अत्याधुनिक पॉलीहाऊस शेड उभारून त्यांनी विदेशी फळे व पालेभाज्यांचे उत्पादन सुरू केले. त्यांचे पहिले व्यापारी पीक कलर कॅप्सिकम (शिमला मिरची) हे होते. या पिकासाठी त्यांनी जवळपास नऊ लाख रुपये गुंतवणूक केली होती.

अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत सुमारे १० टन शिमला मिरचीचे उत्पादन मिळाले. बाजारभाव चांगला मिळाल्याने केवळ दहा महिन्यांत सुमारे ११ लाख रुपये इतके उत्पन्न त्यांनी मिळवले. अत्याधुनिक शेतीतून मिळवलेले हे यश परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

पॉलीहाऊस शेती करताना उत्पादन व्यवस्थापन, खर्च नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि विक्रीपर्यंतची रणनीती या सर्व बाबतीत समाधान इचके यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. पंचायत समिती सदस्य सुदामभाऊ इचके, माजी सरपंच रामदास सांडभोर, फाकटे गावचे माजी सरपंच बारकु वाळुंज, वि.सो. संचालक कैलास बच्चे, दिनकर घोडे, भाऊसाहेब इचके, विजय इचके, राजेंद्र मुंजाळ, बबन हिलाळ, राहुल सांडभोर या सर्वांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यातून इचकेंची शेती अधिक बळकट झाली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर समाधान इचके यांनी शिरूर तालुक्याचा मान वाढवित आदर्श शेतकरी पुरस्कार 2025 पटकावला आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रगतिशील शेतीचा नवा मार्ग तरुण शेतकऱ्यांसाठी खुला होत आहे.