शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील पानमंद मळा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाकलेल्या लाकडांच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दोन शेजाऱ्यांनी हात उठवला. इतकेच नव्हे, तर डोक्यात कुदळीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे.
फिर्यादी केरभाऊ गेणभाऊ पानमंद (वय ६५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ३० एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांचे शेजारी सुजित दिलीप पानमंद आणि दिलीप मारुती पानमंद यांच्यात रस्त्यावर टाकलेल्या लाकडांबाबत वाद झाला. “ही लाकडे तुम्हीच टाकली आहेत,” असा आरोप करत सुजित पानमंद यांनी गैरसमजाच्या भरात शिवीगाळ आणि दमदाटी केली.
फिर्यादी केरभाऊ यांनी वाद टाळण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, सुजित व त्याचे वडील दिलीप पानमंद यांनी त्यांना मारहाण केली. यावेळी सुजित पानमंद याने कुदळीच्या लाकडी दांडक्याने केरभाऊ यांच्या डोक्यात जबर मारहाण केली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. “पुन्हा आमच्याशी वाद घातला तर तलवारीने कापून टाकू,” अशी धमकीही दिली गेली.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास अधिकारी म्हणून पो.ह. आगलावे यांच्याकडे तर अंमलदार पो.ह. शिंदे यांच्याकडे दाखल प्रक्रिया असून, प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या देखरेखीखाली प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा शेजाऱ्यांतील वाद हिंसक वळण घेत असल्याचे या घटनेवरून दिसून येते. नागरिकांनी अशा प्रसंगी संयम बाळगावा आणि कायदा हातात न घेता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे .