शिरुरच्या तहसिलदारपदी बालाजी सोमवंशी

मुख्य बातम्या

नागरीकांची रखडलेली कामे मार्गी लावणार का…? 

शिरुर (अरुणकुमार मोटे ): शिरुर तहसिल कार्यालयाचा पदभार नुकताच प्रभारी तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी घेतला आहे. गेले वर्षाहून अधिक काळ नागरीकांची अनेक संकलंनाची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे शिरुर तालुक्यातील नागरीक त्रस्त आहेत.या बाबत सडेतोड लेखनीच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वेळोवेळी केले आहे. याबाबत इतर पक्षांच्या नेत्यांबरोबरच शिरुर-हवेलीचे आमदार अँड अशोक पवार यांनी उशिरा का होईना याबाबत भूमिका स्पष्ट करुन उपोषणाचा इशारा दिला होता.

पण शिरुरला पुन्हा प्रभारीच तहसिलदार दिल्याने आमदारांची भूमिका नक्की काय राहणार आहे…? हे येत्या 30 जानेवारीनंतरच समजणारआहे. तसेच आमदार पवार यांचे शिरुरपेक्षा फक्त वाघोलीकडे जास्त लक्ष असल्याचे विरोधक सांगत आहे. यापुर्वीच्या तहसीलदार लैला शेख यांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने तत्कालीन तहसिलदार यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून आजपर्यंत पुर्ण वेळ तहसिलदार शिरूरला लाभले गेले नाही.

त्यामुळे नागरीकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना बालाजी सोमवंशी यांनी चार्ज घेतला आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील जनतेला त्यांच्याकडुन कामाच्या खुप अपेक्षा आहेत. यापुर्वी त्यांनी दौंड येथे तहसिलदार असताना उत्कृष्ठ काम केले असुन दौंड वरुन पुणे कार्यालयात जिल्हा पुर्नवसन अधिकारी तहसिलदार म्हणुन चांगले कामकाज सुरु असुन त्यातच त्यांच्यावर आता शिरुरची अतिरिक्त जबाबदारी पडल्याने शिरूरला जास्तीत जास्त वेळ देवून कामाचा निपटारा करणे गरजेचे आहे.

शिरुरची जनता चांगले काम करणाऱ्या आधिकाऱ्याला डोक्यावर घेते. पण चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला जागा दाखवून देते. हे मात्र नक्की. याबाबत नवनिर्वाचित तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्याशी संपर्क साधला असता नागरीकांच्या विविध रखडलेल्या कामांची माहीती घेवून जलद गतीने नागरीकांची कामे प्राध्यान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.