रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेत दोन्ही गटांनी समन्वय साधत एकत्र निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला.पण तरीही शिरुर तालुक्यात कारेगाव पंचायत समिती गण हा त्याला अपवाद ठरत आहे. या गणात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत रंगणार असल्याने संपूर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष कारेगावकडे लागले आहे.
‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ प्रतिष्ठेची लढाई…?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडुन कुमार नाणेकर हे ‘तुतारी वाजवणारा माणुस’ या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या ‘घड्याळ’ या चिन्हावर आपले नशीब आजमावत आहेत.विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या या अंतर्गत संघर्षात भाजपने मनिषा पाचंगे हा स्वतंत्र उमेदवार देत तिसरी ताकद उभी केली आहे. त्यामुळे हि लढत अधिकच रंगतदार होणार आहे.
विधानसभा निकालाचा निवडणुकीत प्रभाव…
कारेगाव गण परिसरात मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. ‘तुतारी’ चिन्हाला मतदारांनी दिलेल्या कौलामुळे हा भाग शरद पवार गटाचा बालेकिल्ला असल्याची चर्चा होती.आता तोच मतदानाचा प्रवाह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टिकून राहणार की मतदार वेगळा निर्णय घेणार हे आता थोड्याच दिवसात कळेल.
स्थानिक राजकारणात प्रचंड हालचाली…
कारेगाव गणात ‘राष्ट्रवादी’ च्या दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून गावोगावी बैठका, संपर्क दौरे आणि शक्तीप्रदर्शनाला वेग आला आहे. हि निवडणुक केवळ एका गणापुरती मर्यादित न राहता, शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीचा खरा प्रभाव कुणाचा…? हे ठरवणारी चाचणी मानली जात आहे.
समेट होणार की थेट संघर्ष…?
कारेगाव गणात दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये अद्याप समेटाची कुजबुज सुरु आहे. मात्र नामांकनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत तोडगा न निघाल्यास, शिरुर तालुक्यात कारेगाव गणात राष्ट्रवादी अंतर्गत ‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ अशीच थेट लढत पाहायला मिळणार आहे. हि लढत झालीच, तर ती अत्यंत चुरशीची, प्रतिष्ठेची आणि राजकीय परिणाम घडवणारी ठरणार आहे. कुमार नाणेकर हा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र असुन सर्वसामान्य लोकांच्या सुख-दुःखात सामील होणारा कार्यकर्ता आहे. तर निर्मला नवले या कारेगावच्या माजी सरपंच आहेत. त्यामुळे कारेगाव गणातील मतदार कुणाच्या बाजुने कौल देणार याकडे शिरुर तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कारेगावच्या सरपंचपदाचा वाद भोवण्याची चिन्ह…?
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कारेगाव येथील ‘सरपंच’ पदाचा वाद काही दिवसांपुर्वी पुन्हा उफाळून आल्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कारेगाव हे गाव राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते भाजपामध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीला येथे मताधिक्य कमी होण्याची चिन्ह आहेत. त्यातच कुमार नाणेकर यांनी कारेगाव गेल्या सहा महिन्यांपासुनच कारेगाव गणात मोठया प्रमाणात मतदारांशी संपर्क वाढवत आपली पकड मजबुत केली आहे.