न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे मध्यरात्री गोठ्याला भीषण आग लागून बैलगाडा मालकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत बैलगाडा शर्यतीसाठी तयार केलेले दोन बैल गंभीररीत्या होरपळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी दुमाला येथील थोरातवस्तीतील गोरक्ष संतोष थोरात (वय २१) यांच्या मालकीच्या गोठ्याला सोमवार (ता. ९) रोजी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेच्या वेळी घरातील सर्वजण झोपेत होते. गोरक्ष थोरात यांचा भाऊ नवनाथ थोरात हा गोठ्यात झोपला होता, तर आई रोहिणी थोरात या घराबाहेर झोपल्या होत्या. दरम्यान, रोहिणी थोरात यांना अचानक जाग आल्यावर गोठ्याला आग लागलेली दिसली. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने घरातील सर्वजण जागे झाले.
View this post on Instagram
बाहेर येऊन पाहिले असता गोठ्याच्या वरच्या बाजूला आग लागलेली होती आणि आगीच्या ठिणग्या खाली बैलांवर पडत होत्या. या आगीत बैलगाडा शर्यतीतील बैलजोडी गंभीररीत्या भाजली असून संपूर्ण गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे संबंधित गोठ्यामध्ये कोणतेही विजेचे कनेक्शन नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही.
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणी गोरक्ष संतोष थोरात यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबरी जबाब दिला असून पुढील तपास सुरू आहे.या आगीत थोरात कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जखमी बैलांचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, तसेच घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.