समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

मुख्य बातम्या

पुणे: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे सांगत एका मांत्रिकाने त्या मुलीलाच जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला होता. यावरुन पालकांनी आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करत असल्याचा देखील प्रकार उघडकीस आला आहे.

तसेच पुण्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेस तिच्या पती , सासू आणि सासऱ्याने सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावल्याची लाजिरवाणी घटना घडली असुन याप्रकरणी या पीडितेच्या पती , सासू , सासरे यांना अटक झाली होती आणि तसेच त्या फरार असलेल्या मांत्रिकाला देखील अटक करण्यात आलेली आहे. या सर्व घटना या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याची मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. अशी खंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

यावरती महाराष्ट्र राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई करेलच. परंतु या सर्व घटना का घडत आहेत. याचा विचार करणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा आहे अस माझं मत आहे आणि हे कारण समूळ नष्ट करणे ही तुमची आमची आणि सर्वांचीच प्रमुख जबाबदारी असल्याचं चाकणकर म्हणाल्या. या बाबतीत महाराष्ट्र राज्य महिला आयोग गांभीर्यपूर्वक विचार करत असून अशा अंधश्रद्धेमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे तसेच समाजातील अशा मानसिकतेत बदल घडविण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असुन महाराष्ट्र राज्य महिला आयोगानी ह्याची गंभीर दखल घेतली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पण अशा मुद्द्यावर जनजागृति करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.