रांजण खळग्यात पाय घसरुन पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर सापडला   

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवारी ( दि.८) सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास पाय घसरून रांजणखळग्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर गुरूवारी (दि. १०) सकाळी सापडला आहे.

वाशिम जिल्ह्यातील पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना तिचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली होती. तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले. मात्र नंतर पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली होती. सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेत महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले. मात्र महिलेचा तपास लागला नाही.

पर्यटकांनी रांजण खळगे पाहण्यासाठी आल्यानंतर फोटोसेशन करताना किंवा पर्यटनाचा आनंद लुटताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी केले.