सरकारचा निवडणुकीपूर्वी ‘दिवसा वीज’ चा डंका अन निकालानंतर शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोख

मुख्य बातम्या शिरूर तालुका

न्हावरे (तेजस फडके): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सरकारच्या वतीने “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज” देण्याची ग्वाही देत गावोगावी घोषणा झडल्या. राजकीय व्यासपीठांवरुन मोठमोठी आश्वासने देत मतांची मागणी करण्यात झाली. मात्र निकाल जाहीर होताच त्या आश्वासनांचा फुगा फुटला आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोखच आला.

सध्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कडून शेतीपंपांसाठी पुन्हा मध्यरात्रीचे वेळापत्रक लागू केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. “दिवसा वीज” ही घोषणा निवडणूकपुरतीच होती का…? असा थेट सवाल आता संतप्त शेतकरी विचारत आहेत.

रात्रीची वीज, जीवावरचा खेळ

शेतात दिवसभर कष्ट केल्यानंतर रात्री १० नंतर शेतात जाऊन मोटर सुरु करणे, अंधारात तासन्‌तास पाण्याची वाट पाहणे, कमी व्होल्टेजमुळे मोटारी जळण्याचा धोका हा शेतकऱ्यांचा रोजचा दिनक्रम झाला आहे. तसेच उन्हाळ्यात सर्पदंश, बिबटयासारख्या वन्यप्राण्यांचा धोका तसेच चोरीच्या घटना वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारने निवडणुकीपुर्वी “मतं घेताना दिवसा वीज, आणि मतं मिळाल्यावर रात्रीची वीज” हा कोणता न्याय…?” असा संतप्त प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

निवडणुकात दिलेल्या आश्वासनांची फसवणूक…?

निवडणुकीपूर्वी जाहीर सभांमध्ये दिवसा वीजपुरवठ्याचे आश्वासन देताना कोणती सरकारने कोणती तांत्रिक तयारी केली होती…? पुरेशी क्षमता, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, लाईन लॉस नियंत्रण याबाबत काही ठोस योजना होती का…? असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारत असुन जर काही ठोस योजना नव्हती, तर मग शेतकऱ्यांची दिशाभूल का केली…? आणि जर होती, तर आता ती अमलात का आणली जात नाही…? प्रशासनाने याचे स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

अन्नदात्याशी खेळ थांबवा अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही…?

शेतकरी हा केवळ मतदार नाही.तो राज्याचा अन्नदाता आहे. त्याच्या श्रमावर संपूर्ण अर्थव्यवस्था उभी आहे. सरकारने निवडणुकीत गाजर दाखवून नंतर त्यालाच अंधारात ठेवणे ही प्रशासनाची थेट फसवणूक आहे असा रोष व्यक्त होत आहे. आता शब्द नव्हे, कृती हवी, दिवसा वीज द्या, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेतकरी संघटनांनी इशारा दिला आहे.तसेच दिवसा वीजपुरवठ्याचे लेखी वेळापत्रक जाहीर करावे. कमी दाबाच्या समस्या तातडीने सोडवाव्यात. अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.