प्रत्येक व्यक्तीला सतत काही ना काही आजारपण उद्भवत असते. मग अगदी किरकोळ खोकला असोत किंवा एखादा गंभीर आजार असोत. त्यांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा आजारांची लक्षणे जाणून घेतल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता येतात. तसेच शरीराला काय बाधत आहे, ते ही समजून घेता येते. त्रासाचे कारण समजल्यावर त्या आजाराचे निवारण करणे जरा सोपे जाते. असे काही आजार असतात, ज्यांना आपण त्रास म्हणूनच संबोधतो. जसं की पित्ताचा त्रास. ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्यांना आठवड्यातून एकदा तरी उलट्या होतात. प्रत्येक आठवड्याला या त्रासाला सामोरे जावे लागते. अगदी वैताग येतो.
विविध औषधे केली तरी तात्पुरता आराम मिळतो आणि मग पुन्हा जैसे थे. पित्ताचा त्रास त्यांना होतो ज्यांच्या शरीरात उष्णता फार जास्त असते. उष्णतेमुळे पित्तामध्ये वाढ होते आणि मग ते पित्त उलटून पडते. जर ते बाहेर निघाले नाही तर, मग डोके प्रचंड दुखायला लागते. पित्त शांत होईपर्यंत हा त्रास सहन करावा लागतो. नेटमेड्स तसेच क्रिस्टाफार्मा सारख्या विविध साईट्सवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, काही घरगुती उपायांनी पित्त शांत करता येते.
आम्ल पित्त
काहीही खाल्यावर जळजळणे किंवा आंबट ढेकर येणे. तसेच छातीत सारखे दुखणे आणि श्वास घेताना त्रास होणे ही हायपर अॅसिडीटीची लक्षणे आहेत. त्याला आयुर्वेदामध्ये आम्ल पित्त असे म्हटले जाते. असा त्रास सारखा झाल्याने मग उलट्या होतात. या आम्ल पित्ताच्या त्रासापासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय करा.
१) रोज रात्री झोपण्याआधी चमचाभर धने पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचे. धने पित्तशामक असतात.
२) आपल्याकडे जेवणानंतर बडीशेप खाण्याची पद्धत आहे. कारण बडीशेप पचनासाठी फार चांगली असते. तसेच पोटाला थंडावा देते. बडीशेप आणि खडीसाखर खाल्याने पित्तावर नियंत्रण ठेवता येते. जेवणानंतर हे मिश्रण खात जा.
३) आम्ल पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मस्त उपाय म्हणजे गुलकंद खाणे. गुलकंद थंड असतो. गुलकंद हा पित्तशामकही असतो. चमचाभर गुलकंदही पुरेसा आहे.
४) नारळ पाणी पिणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. तसेच लिंबू पाणीही पिऊ शकता.
(सोशल मीडियावरून साभार)