जम्मू-काश्मीर: “धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे,” असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी काढले.
पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला दिलेले आश्वासन पूर्ण करत शिवसेनेकडून आर्थिक मदत आणि नवे घर सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमात शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.
२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण हल्ल्याची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, अंधाधुंद गोळीबार सुरू असताना आदिल यांनी निर्भीडपणे पुढे जात दहशतवाद्यांचा सामना केला आणि पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले.
“तो फक्त एका कुटुंबाचा मुलगा नव्हता, तर देशाचा खरा योद्धा होता. त्याचे बलिदान इतिहासात कोरले गेले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
शिवसेनेच्या वतीने आदिल यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत आणि पक्के घर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे वचन पूर्ण करत उभारण्यात आलेल्या घराला “आनंदनाथ भवन” असे नाव देण्यात आले असून, ते Anand Dighe यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे.
“हे घर केवळ निवारा नाही, तर एका वीराच्या बलिदानाचा सन्मान आहे. आम्ही जे बोलतो ते करतो, हीच शिवसेनेची ओळख आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी परिसराला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याची मागणी केली असून, केंद्र सरकारच्या सहकार्याने सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.
आदिल यांच्या कुटुंबीयांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केले. हे घर आमच्यासाठी सन्मान आणि आधार आहे.”
शेवटी शिंदे यांनी Bal Thackeray यांच्या कार्याची आठवण करून देत सांगितले की, शिवसेना नेहमीच जात-धर्माच्या पलीकडे जाऊन मदत करत आली आहे.
घर सुपूर्द कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आदिल यांच्या कुटुंबियांना घर सुपूर्द करण्यात आले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, ही मदत कोणत्याही राजकारणासाठी नसून एका वीराच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आहे.तसेच, पहेलगाम परिसरात पर्यटन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.