सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईची लोकल म्हणजे लाखोंची लाईफलाईन. दररोज प्रवासी धक्के खात आणि प्रचंड गर्दीतून प्रवास करतात. अशा स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले की, ‘कार्यालयातील गर्दी कमी करणे. तसेच मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरील ताण कमी करणे. हे या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे’. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत मुंबईतील वाढत्या लोकल अपघातांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही अशाच प्रकारच्या वेळेच्या नियोजनाचा विचार करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केली जाईल, असंही सरनाईक म्हणाले.

दरम्यान, सरनाईक यांनी स्पष्ट केलं की, ‘अर्धा तासाने कामाला सुरूवात केली तर, सायंकाळी कामाचे तास वाढतील, एकूण कामाचे तास बदलणार नाही’, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. तसेच, ‘राज्यातील मंत्री प्रवाशांना मेट्रो ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायी पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत’, असंही प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

गेल्या काही महिन्यांत लोकल रेल्वेच्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली. खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. अशा वाढत्या प्रकरणांवर उपाय म्हणून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच बैठक घेण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, सरनाईक यांनी, ‘कार्यालयीन वेळेत बदल करणे हा किरकोळ बदल जरी वाटत असला तरी, लाखो प्रवाशांना दैनंदिन प्रवासादरम्यान दिलासा मिळू शकतो’, असं सरनाईक म्हणाले.