अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी आहे की सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी?

महाराष्ट्र

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी प्रशासक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरुन सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी तयार करण्यात आलाय अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या अर्थसंकल्पात सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरु असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करण्यात आल्या असल्याचंही म्हटल आहे.

आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पावरुन सरकारवर जोरदार टीका केली. कंत्राटदारांसाठी अर्थसंकल्पातील आकडे फुगवले आहेत. कंत्राटदारांसाठी वाढीव पैसा दाखवायचा, कंत्राटदारांसाठीच वाढीव पैसे खर्च करायचे हा राज्यातल्या घटनाबाह्य सरकारचा हेतू आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. भरसाठ खर्च दाखवून मुंबई महापालिका तोट्यात दाखवून मुंबईला दिल्लीच्या दरवाजात कटोरा घेऊन उभं करायचं हा या सरकारचा डाव आहे. दिल्लीसमोर मुंबईची मान झुकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, दावोस दौऱ्यात ४० कोटींची उधळपट्टी करण्यात आली. मात्र, त्याचे उत्तर अद्याप सरकारने दिलेलं नाही. रस्त्यांचा विषय काढल्यावर पालिकेने उत्तर दिले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटकासाठी तरतूद करण्यात आली आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रासाठी भरीव तरतुद नाही. महापालिकेत अधिकार हे लोकप्रतिनिधींना असतो. ५० हजार कोटींचे बजेट आज जाहीर झाले. हे बजेट नेमकं कशासाठी वाढलं? नवीन खर्च यात दिसत नाही. हा अर्थसंकल्प मुंबईकरांचा नसुन वर्षामधुन छापून आलेला आहे. कंत्राटदारांसाठी हे बजेट असल्याचा आरोपही आदित्या ठाकरे यानी केला.

मुंबईच्या विकासासाठी महापालिकेने काही सूचना मागवल्या होत्या. त्यात आम्ही सूचवलं होतं की, मुंबईत सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करायला हवं. नव्या प्रकल्पांची सध्या आवश्यकता नाही. ही सूचना पालिकेने मान्य केली असल्याचं अर्थसंकल्पावरुन दिसत आहे. कारण यंदाच्या अर्थसंकल्पात एकही नवा प्रकल्प दिसत नाही. असं असलं तरी पालिकेचा अर्थसंकल्प मात्र ५० हजार कोटींच्या पुढे गेला आहे. नव्या प्रकल्पांशिवाय अर्थसंकल्प इतकं वाढला कसा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.