टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही सरकारवर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका करत MPSCच्या ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsAppवर फिरल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा केला. नीट आणि टीईटीनंतर आणखी एका पेपरफुटीच्या आरोपामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचे ते म्हणाले.
सपकाळ यांनी आरोप केला की, पेपरफुटी, निकालातील घोटाळे आणि गुणांतील गैरव्यवहारांच्या तक्रारी व पुरावे समोर येत असतानाही सरकार आणि संबंधित यंत्रणा गंभीर नसल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पेपरफुटीमागील रॅकेट आणि त्याला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, याची उत्तरे सरकारने द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
शालार्थ घोटाळ्याचाही उल्लेख करत सपकाळ यांनी भाजपाशी संबंधित नेत्यावर कारवाई झाल्याचा संदर्भ देत शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला. बनावट शालार्थ आदेशांच्या माध्यमातून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा दावाही त्यांनी केला.
उद्योग क्षेत्रावर भाष्य करताना, २०२३ ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील २८,७६४ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद झाल्याचा दावा सपकाळ यांनी केला. उत्पादन खर्चातील वाढ, वित्तपुरवठ्याच्या अडचणी, भ्रष्ट प्रशासन आणि गुंडागर्दीमुळे उद्योग बंद पडत असून त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले.
शिक्षण आणि रोजगार या दोन्ही आघाड्यांवर राज्यातील तरुणांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत, ही परिस्थिती कायम राहिल्यास जनतेत तीव्र नाराजी निर्माण होईल, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.