मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा शोध लागलेला नसल्याने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर येथे १७ मार्च २०२६ रोजी १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले होते. मात्र या गंभीर घटनेला तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपी अद्याप फरार असून तपासात अपेक्षित प्रगती झालेली नाही. त्यामुळे तपासाच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पीडित कुटुंबीयांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात या प्रकरणाचा उच्चस्तरीय आढावा घेऊन तपासातील विलंब आणि त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करावी, आवश्यक असल्यास विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करावे, तसेच आरोपीला तातडीने अटक करून पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिलेल्या निवेदनात, घटनेनंतर त्यांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप आरोपीचा शोध लागलेला नसल्याने त्या आश्वासनाची पूर्तता झालेली दिसून येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून तपासाचा आढावा घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत व पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.पीडित कुटुंबीयांना आता केवळ सहानुभूती नव्हे, तर प्रत्यक्ष न्याय मिळणे आवश्यक असून या प्रकरणी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.