संत गाडगे महाराज यांचा जीवन संदेश आचरणात आणणे काळाची गरज; महापौर रितू तावडे

महाराष्ट्र

मुंबई: संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, गोरगरीब रुग्णांची सेवा आणि निवारा या सेवाकार्यांवर दिलेला भर आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. त्यांचा जीवन संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी केले.

संत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स – एस. गेरगे हॉस्पिटल परिसरातील गाडगेबाबा धर्मशाळेत सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.

महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “येथील सेवाभावी उपक्रम पाहून मी प्रभावित झाले आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छतेचे विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून, नगरसेवक व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाल्यास स्वच्छतेत आपण नवा उच्चांक गाठू शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेमार्फत आयोजित स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये भविष्यात सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान महापौरांच्या हस्ते रुग्णांना फळे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. राजश्री कटके, गजाननराव नागे, संस्थेचे एकनाथ ठाकूर, उत्तमराव लोणारकर, अमोल ठाकूर आदी उपस्थित होते.