मुंबई: “शासकीय विश्रामगृह हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक विश्रामगृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे देवस्थानच्या ठिकाणी असणारी विश्रामगृहे अस्वच्छ व दूरावस्थेत आहेत. त्यामुळे संसर्ग होऊन आजार होण्याची शक्यता आहे. त्यांची पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छता राखणे आवश्यक आहे. तसेच या विषयावर प्रश्नोत्तराच्या तासात मर्यादित वेळेत मर्यादित उत्तर देने योग्य होणार नाही. या विषयी नियम ९७ नुसार सभागृहात सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात राज्यातील विश्रामगृहाबाबत नियम ९७ अंतर्गत सविस्तर चर्चा करावी आणि सर्वांचे समाधान व्हावे” असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच विसावा विश्रामगृहाची पुनर्बांधणी झाली असल्याचे कळते आहे. त्यालाही आपण सर्वांनी मिळून भेट देऊ असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील शासकीय विश्रामगृहाची दूरावस्था या विषयावर ज्येष्ठ सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यानी प्रश्न उपस्थित केला. आ प्रविण दरेकर, आ सतेज पाटील यांनीही चर्चेत सहभाग घेतला. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले. मात्र याप्रश्नाबाबत सदस्यांना सविस्तर बोलायचे असल्याने आणि याविषयावर सर्वाचे समाधान होणे आवश्यक असल्याने सविस्तर चर्चा घेणार असल्याचे डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी सांगितले.