छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख तथा माजी सरपंच राजू राठोड यांचे आज मुंबईतील बेलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा गावचे सरपंच म्हणून राजू राठोड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेली मैत्री यामुळे त्यांची तालुक्यात स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.
शिवसेनेतील फुटीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत निवडणुकीपूर्वी राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. सत्तार आणि राठोड यांच्यातील मैत्री तालुक्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय राहिली.
नुकत्याच झालेल्या सोयगाव खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत सत्तार यांनी राठोड यांच्यावर चेअरमनपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या पत्नी आणि मुलगी मोनाली यांच्या माध्यमातून ते जिल्हा परिषदेच्या राजकारणातही सक्रिय होते.
मध्यंतरी प्रकृती बिघडल्याने राठोड यांना जुलै महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईतील बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात जाऊन राठोड यांची भेट घेतली होती. मात्र, हीच त्यांची अखेरची भेट ठरली.
‘विश्वासू साथीदार गमावला’ – अब्दुल सत्तार
राजू राठोड यांच्या निधनावर आमदार अब्दुल सत्तार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “राजूभाऊंचे अकाली जाणे मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनाने एक जिव्हाळ्याचा सहकारी, मित्र आणि आपला माणूस आपण गमावला,” अशा भावना सत्तार यांनी व्यक्त केल्या.
“राजू भाऊ राठोड यांना राजकारणाचा सखोल अभ्यास होता. ग्रामीण भागाची इत्थंभूत माहिती, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये होती. अनेक निवडणुका आम्ही खांद्याला खांदा लावून एकत्र लढलो. या प्रदीर्घ राजकीय प्रवासात अनेक सुख-दुःखाचे प्रसंग आम्ही सोबत अनुभवले. आज त्यांची साथ कायमची सुटली, ही भावना मनाला चटका लावणारी आहे,” असे सत्तार म्हणाले.
“त्यांच्या जाण्याने शिवसेनेची तसेच सोयगावच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव सदैव जाणवत राहील,” अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी राजू राठोड यांना श्रद्धांजली वाहिली.