त्या ‘एसीपी’ला निलंबित करा, अन्यथा…

महाराष्ट्र

औरंगाबाद: पोलीस दलातील ‘एसीपी’ अधिकाऱ्यानेच नशेत महिलेचा विनयभंग केल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. अनेक संघटनांनी ढुमे याच्या निलंबनाची मागणी केली आहे. दरम्यान खासदार जलील यांनी मंगळवारी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून, ढुमे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.

औरंगाबाद बंदची हाक…

खासदार जलील यांनी डीजीपी रजनीश सेठ यांच्याशी संपर्क करुन घडलेल्या घटनेबाबत चर्चा केली आहे. सोबतच ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ढुमे यांना बुधवारपर्यंत (18 जानेवारी) निलंबित न केल्यास शुक्रवारी (20 जानेवारी) औरंगाबाद शहरात बंद पाळला जाणार असल्याचा इशारा जलील यांच्याकडून देण्यात आला आहे. सोबतच सर्व राजकीय, सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्र येऊन हा बंद पाळतील. तसेच शहरातील क्रांतीचौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा जलील यांनी दिला आहे.

शहरातील नागरिकांत संतापाचे वातावरण!

औरंगाबाद शहरात ज्यांच्यावर सुरक्षेतेची जबाबदारी आहेत तेच पोलीस महिलेचा विनयभंग करत असतील तर नागरिकांनी कोणाकडे मदत मागावी असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे. त्यामुळे या घटनेने सध्या शहरात मोठ्या संतापाचे वातावरण आहे. तर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस दलाकडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.