मुंबई: मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. प्रसाद लाड यांचे ७ तर शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये ‘ठाकरे ब्रँड’चा २१-० असा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याला मुंबईकरांनी नाकारले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते बुधवारी पत्रकारांशी बोलत होते. शशांक राव आणि प्रसाद लाड देखील आमचेच आहेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ही एका पतपेढीची सहकारी संस्थेची निवडणूक होती, त्यात काही मोठं नाही. यामध्ये राजकारण करू नये असे माझं मत होतं. पण त्यांनी (ठाकरे) त्याचे राजकारण करण्यास सुरुवात केली. ठाकरे पुन्हा एकत्र येत आहेत आणि ठाकरे ब्रँड जिंकेल, असे त्यांनी सांगितले. पण त्यांच्या राजकारणाला जनतेनं उत्तर दिलंय. पतपेढीसारख्या साध्या निवडणुकीतही लोकांनी ठाकरेंना नाकारलं आहे. मतदारांनी ठाकरे ब्रँड नाकारला.
बीएमसी निवडणुकीच्या आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड उतरला, पण त्यांना दारूण पराभव स्विकारावा लागला. ९ वर्षांपासून सत्ता असतानाही ठाकरेंना मोठा हादरा बसलाय. २१ सदस्यांच्या निवडणुकीत ठाकरेंना एकही जागा मिळाली नाही. भाजप नेते आशिष शेलार यांनाही यावरून निशाणा साधलाय. ते म्हणाले की, आम्ही, भाजप म्हणून, ते लढवले नाही. शिवसेना (यूबीटी) आणि मनसेने हा राजकीय मुद्दा बनवला. पण त्यांना खातेही उघडता आले नाही. मुंबईकर कोणाला पाठिंबा देत आहेत हे दाखवणारे हे निकाल आहेत. बीएमसी निवडणुकीदरम्यान, आम्ही राव आणि लाड यांना आमचे स्टार प्रचारक बनवण्याचा विचार करत आहोत.